सामाजिक

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी किसान सभेची कोकण भवनवर निदर्शने !

विठ्ठल ममताबादे, उरण

अखिल भारतीय किमान सभेच्या वतीने कोकण भवन, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई येथे आज जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांच्या घरे आणि जमिनीच्या प्रश्नावर राज्यभरात ही निदर्शने करण्यात आली. त्याचाच हा एक भाग होता. या संदर्भात किसान सभेच्या वतीने कोंकण भवन येथील सह आयुक्त पुनर्वसन कोकण विभाग रवींद्र पाटील यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.

या निदर्शनात महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या. गेल्या ५० वर्षात रायगड व नवी मुंबईमध्ये विविध प्रकल्पांसाठी मोठ्या प्रमाणावर भूसंपादन होत आहे. त्यामुळे शेती उध्दवस्त झाली व आता येथील विकासाच्या नावाने गावेही उध्दवस्त होऊ घातली आहेत. या सर्व धोरणांच्या विरोधात जमिनीच्या व घरांच्या प्रश्नांवर ही निदर्शने झाली. यावेळी विरार-अलिबाग कॉरीडोर / पागोटे ते चौक ग्रीनफिल्ड महामार्ग, रेवस रेड्डी सागरी महामार्गासाठी भूसंपादनास गुठ्यांला ५० लाख रुपये सरसकट दर जाहीर करा, यासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेवून १९५५ चा फक्त हायवे अँक्ट न लावता, २०१३ च्या भूसंपादन कायद्याची परिपूर्ण अंमलबजावणी करा. शेतीसाठी व घरांसाठी पर्यायी जमिन द्या., खाडी किनाऱ्यावरील शेती व गावे वाचविण्यासाठी बांध बंधिस्तीचे मजबुतीकरण करा, सिडको, नैना एम.एम.आर.डी.ए. मध्ये येणाऱ्या गावातील घरांना व विस्तारीत गावठाणातील घरांना प्रॉपर्टी कार्ड (सनद) द्या, लॉजिस्टिक पार्कचे भूसंपादन २०१३ च्या कायद्यानुसार करा, गेल पाईप लाईनग्रस्त शेतकऱ्यांना योग्य मोबदला द्या, शेती आणि गावे उदध्वस्त करणारे नैना व एम. एम.आर.डी.ए. प्रकल्प रद्द करा, नवी मुंबई विमानतळ प्रकल्पग्रस्तांना वाढीव घरभाडे द्या, शुन्य पात्रता रद्द करा, तलावपालीला तिप्पट जागा द्या, मच्छीमारांना नुकसान भरपाई व प्रत्येक वारसाला विमानतळामध्ये कायम नोकरी द्या, सिडकोचे साडेबारा टक्के भूखंडाचे त्वरीत वाटप करा, मावेजा रद्द करा, गरजेपोटी परंतु स्वतः च्या जागेत बांधलेल्या घरांना कायमस्वरुपी प्रॉपर्टी कार्ड द्या, जे.एन.पी.टी. १२.५% योजनेच्या भूखंडाचे वाटप सिडकोप्रमाणे करा. आलेल्या धर्माध मनुवादी जनविरोधी भाजप मित्र पक्षांच्या कार्पोरेट धार्जिण्या (अदानी-अंबानी) सरकारच्या शेतकरी श्रमिक विरोधी धोरणांचा परिणामामुळे देशातील शेतीवर संकट आले आहे. त्यामुळे शेतकरी श्रमिक विरोधी धोरणे रद्द करा अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या.

यावेळी किसान सभेचे अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे, संजय ठाकूर, कामगार नेते भूषण पाटील, जनवादी महिला नेत्या हेमलता पाटील, तर शिष्टमंडळात किरण केणी, अशोक हुद्दार,अशोक भोपी, चांगुणा डाकी जयश्री माळी आदी पदाधिकारी कार्यकर्ते सदस उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!