नारळी पौर्णिमा सण उत्साहात साजरा !
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) युवासेना शाखा देवद-पनवेल तर्फे आयोजन

संजय कदम, पनवेल
देवद गावातील नारळी पौर्णिमा कार्यक्रमात प्रसिद्द गायक आणि साईभक्त जगदीश पाटील यांच्या येण्याने उत्साहाला जोश आला. शोभा यात्रा मिरवणूक काढण्याआधी जगदीश पाटील यांना शाल आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. शिवसेनेचे उपविभाग प्रमुख जयंत पाखरे, हेमंत म्हात्रे, बिपिन झुरे, राजेश वायरे, नंद किशोर मांजरेकर, विनोद भोईर दादा यांनी मिरवणुकीला सुरुवात केली.

खवळलेल्या समुद्राला शांत करण्यासाठी सोन्याचा नारळ अर्पण केला जातो. देवद येथील अनेक कोळी बांधव महिलांनी पूजा करुन मोठ्या उत्साहाने हा सण साजरा केला. या दिवशी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करतात. दोन महिन्यांपासून बंद असलेल्या मच्छिमारी व्यवसाय आणि जल व्यापार पुन्हा सुरू केला जातो. म्हणूनच या सणाचे कोळी बांधवांमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. पावसाळ्याचे दिवस वगळता संपूर्ण वर्षभर कोळी बांधव समुद्रात बोटीवर असतो. भर समुद्रात मासेमारी करायला निघालेल्या आपल्या धन्याच्या सुरक्षिततेसाठी कोळी महिला समुद्र देवाची पूजा करतात. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित राहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव समुद्राला नारळ अर्पण करतात. नारळ हे सर्जनशक्तीचे प्रतीकही मानले जाते. तसेच या दिवसासाठी नारळाच्या करंजीचा नैवेद्य बोटीला आणि समुद्राला दाखवतात. खोल समुद्रात जाणाऱ्या आमच्या धनी कुंकवाचे रक्षण कर, आमच्या बोटीवर मुबलक मासोळी मिळू देत, असे गाऱ्हाणे कोळी महिला समुद्राला घालतात. नारळी पौर्णिमेच्या शोभायात्रा मिरवणूकीत शिवसेना-युवासेना शाखा देवद येथून निघून गावदेवी मंदिर ते देवद ग्रामपंचायत जवळ गाढी नदीत नारळ अर्पण करण्यात आला.
यावेळी कोळी बांधव महिलांसह शिवसेना विधानसभा संघटक दिपक निकम, शाखा प्रमुख सुरेश माने, उप शाखा प्रमुख मनोहर कदम, भिकाजी चव्हाण, योगेंद्र यादव, मोहन खुजे, सिद्धेश चव्हाण, ऋतिक टावरी, शिवसेनेच्या महानगर संघटिका लीनाताई गरड, व त्यांचे पती अर्जुन गरड कॉलनी फोरमचे मुख्य समन्वयक मधु पाटील, शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख विश्वास पेटकर उपस्थित होते, महिला संघटिका तनुजा झुरे, अर्चना चव्हाण, उज्वला कांबळी, अर्चना पाटील, ऋतुजा हिरलेकर, श्रद्धा वायंगणकर, रुहीता कांबळी, मीना यादव अदि उपस्थित होत्या.
