तब्बल ५ वर्षांनी होणार पेणची आमसभा !
विविध नागरी प्रलंबित प्रश्नांनी गाजणार आमसभा. आगरी समाज सभागृह येथे आमसभेचे आयोजन.
राजमुद्रा न्यूज नेटवर्क
तब्बल ५ वर्षांनी म्हणजे कोरोना महामारीनंतर पेण तालुक्याच्या आमसभेचे आयोजन आगरी समाज सभागृह येथे पेण-सुधागड मतदार संघाचे आमदार रविशेठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक २४ फेब्रुवारी रोजी केले आहे.
पेण तालुक्यातील विविध प्रलंबित प्रश्नांनी ही आमसभा गाजणार असल्याची चर्चा ऐकायला मिळत आहे. पेण तालुक्यातील पाणी, रस्ते, खार बंदिस्ती, पेण अर्बन बँक यांसह विविध प्रकारच्या शासनाच्या योजनांच्या बाबतीत ही आमसभा गाजणार आहे. पंचायत राज समितीच्या शिफारशीनुसार पंचायत समितीच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी ही आमसभा पेण-सुधागड विधानसभा मतदार संघाचे आमदार रविंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडणार असून या आमसभेत खारेपाट भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, खारबंदिस्तीचा प्रश्न, मुंबई-गोवा महामार्गाचे रखडलेले काम, पेण अर्बन बँक घोटाळा, पेण शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, घरकुल योजना, बाळगंगा धरण प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न, गणपती कारखानदारांचा पीओपी संदर्भातील प्रश्न, गेल, एमएमआरडीए, रिलायन्स, एमआयडीसी, उपजिल्हा रुग्णालयातील सुखसोई, प्रकल्पांमुळे प्रकल्पग्रस्तांवर होणारे अन्याय तसेच पेण तालुक्यातील ग्रामीण भागातील निधि असूनही राखडलेले रस्ते आदी प्रश्नांनी ही आमसभा गाजणार असल्याचे बोलले जात आहे.
मात्र बऱ्याच वर्षानंतर लागणाऱ्या या आमसभेत पेणमधील नागरिकांना आपले प्रश्न मांडता येणार आहेत का ? की पाचवर्षांनी होणारी ही आमसभा एकतर्फी होणार ? आणि जनतेच्या उपस्थित प्रश्नांना अधिकारी कशा प्रकारे समर्पक आणि समाधानकारक उत्तरे देऊन. नागरिकांना कशाप्रकारे न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहेत. तर विद्यमान आमदार हे जनतेचे प्रश्न सोडविण्यासठी कशाप्रकारे भमिका घेणार हे उद्या स्पष्ट होणार आहे.
आमसभा म्हणजे काय ? भारत हा खेड्यांचा अर्थात गावांचा देश आहे. अनेक गावे मिळून हा देश बनलेला आहे. गावखेड्यांच्या व्यवस्थेला देशात पंचायतराज म्हणून ओळखलं जातं. ग्रामपंचायत हा या पंचायतराजचा मुलाधार आहे. ग्रामपंचायतचे कामकाम जसे सरपंच, ग्रामसेवक आणि ग्राम सदस्य मिळून करतात आणि त्यांच्यावर ग्रामसभेद्वारे संपूर्ण मतदार अंकूश ठेवत असतात, अगदी तसेच विधानसभा मतदारसंघाचे कामकाम हे आमदार, विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी मिळून करत असतात. आणि तालुक्यातील अथवा विधानसभेतील सर्व मतदार आमसभेद्वारे संबंधितांवर अंकूश ठेवतात. परंतू ग्रामसभा आणि आमसभा यांचे कार्यपद्धती पूर्णतः वेगळी असते. महत्वाचा फरक म्हणजे घटनेनुसार ग्रामसभेचे जसे नियम आहेत, तसे आमसभेबाबत नाही. म्हणजे आमसभा बोलावणे आणि त्याचे कार्यचलन करणे यासाठी कुठलेही बंधन नसते. परंतू आमसभा बोलावणे आणि तिची कार्यपद्धती याबाबत काही नियम आहेत. आमसभा ही एका आर्थिक वर्षाकरिता असते. त्यामुळे प्रत्येक आर्थिक वर्षात आमसभा होणे गरजेचे आहे. आमसभेमुळे जनतेला प्रत्यक्षात सर्व विभागांच्या कामांची माहिती होते आणि कामात पारदर्शकता निर्माण होते. तसेच जनतेला थेट अधिकारी, कर्मचारी आणि लोकप्रतिनिधी यांच्याशी संवाद साधता येतो आणि आपले प्रश्न, समस्या मांडता येतात.

