ठळक बातम्याताज्या बातम्याराजकीय

लढा अजून संपलेला नाही. तो आता अधिक प्रखर झालेला आहे. – सिद्धार्थ इंगळे

विठ्ठल ममताबादे, उरण

उरण तालुक्यातील शेवा कोळीवाडा येथील जेएनपीटी प्रकल्पबाधित मच्छिमार बांधवांवर गेली ४० वर्षे अन्याय चालू आहे. त्यांच्या गावाचे विस्थापन करून कायदेशीर पुनर्वसन न करता, अनेक वर्षे या कोळी बांधव आणि भगिनींना संक्रमण शिबिरात (Transit Camp) ठेवण्यात आले. अखंड संघर्ष, अंगावर खटले घेऊन, पुनर्वसनाच्या हक्कासाठी लढा देत अखेर १०.४६ हेक्टर जागेस दिनांक १७ नोव्हेंबर २०२१ रोजी मंजुरी मिळाली. या मंजुरीस केंद्र सरकारची मान्यता मिळूनही जेएनपीटी प्रशासन, रायगड जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार शेतकरी व बिगर शेतकरी २५६ भूखंड नकाशा व भुखंड यादीला मंजूरी असताना सुध्दा वाटपास टाळाटाळ करीत आहेत. या अन्यायाविरोधात आणि रक्षाबंधन या विश्वासाच्या सणाचे पवित्र दिवशी कोळी बांधवांनी मंजूर नकाशा नुसार सिंबॉलिक ताबा व भूखंड वाटपाचा कार्यक्रम सुरु केला आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन कुदळ मारून व नारळ फोडून करण्यात आले. उदघाटन सोहळा सिध्दार्थ इंगळे,नंदकुमार पवार, रमेश कोळी व त्यांची पत्नी उज्वला कोळी यांच्या हस्ते झाला. सर्व वरिष्ठ महिला व पुरुष यांनी श्री गणेश पुजा केली. या प्रसंगी वकील सिद्धार्थ इंगले, नंदकुमार पवार, कोळी बांधवाचे सर्वेसर्वा रमेश कोळी, सुरेश कोळी, परमानंद कोळी, मंगेश कोळी, ऍड. विकास शिंदे तसेच सर्व समस्त कोळी बांधव व भगिनी उपस्थित होते.

माझ्यावर हा मान सोपवल्याबद्दल मी मनःपूर्वक आभारी आहे. माझी सामाजिक जबाबदारी आणि नैतिक कर्तव्य समजून, मी आपल्यासाठी सदैव कर्तव्यदक्ष राहीन. लढा अजून संपलेला नाही तो आता अधिक प्रखर झालेला आहे असे परखड मत मुंबई उच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ इंगळे यांनी व्यक्त केले. गेली ४० वर्षे उलटूनही पुनर्वसन न झाल्याने शेवा कोळीवाडा (हनुमान कोळीवाडा) ग्रामस्थ आक्रमक झाल्याने सिंबॉलिक ताबा व भूखंड वाटपचा कार्यक्रम संपन्न झाल्याने प्रशासनाला ही एक चपराक आहे. या कृतीतून प्रशासनाला थेट इशारा देण्यात आला आहे. या कृतीतुन ग्रामस्थांनी केंद्र, राज्य शासनाचा निषेध केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!