अर्बन बँक बुडवीणाऱ्या आरोपीला मत मागण्याचा अधिकार नाही – नरेन जाधव, कार्यध्यक्ष पेण ठेवीदार संघर्ष समिती
प्रत्येक संचालकाकडून प्रत्येकी २३ कोटी ९० लाखांची वसुलीची नोटीस!
अरविंद गुरव, पेण
पेण अर्बन बँकेचा सुमारे ७५० कोटी रुपयांचा घोटाळा होऊन आज १५ वर्षे झाली. लाखो ठेवीदार आणि खातेदारांचे पैसे या बँक घोटाळ्यात बुडीत गेले. या घोटाळ्यांतील आरोपी आज मुक्त शहरामध्ये मुक्त संचार करीत आहेत. पेण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मतांचा जोगवा मागत फिरत आहेत. बँक घोटाळ्यांतील मुख्य आरोपी शिशिर धारकर आम्ही पेणकर विकास आघाडी आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रिया धारकर आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी मत मागण्यासाठी मतदारांकडे जात आहे. एवढा मोठा बँक घोटाळा करुन शिशिर धारकर याला मत मागण्याचा अधिकार कोणी दिला ? असा सवाल पेण अर्बन बँक ठेवीदार संघर्ष समिती कार्याध्यक्ष नरेन जाधव यांनी पेण येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केले.
पुढे नरेन जाधव यांनी सांगितले की, पेण अर्बन बँक घोटाळ्यातील २५ आरोपींवर प्रत्येकी २३ कोटी ९० लाख रुपयांची सामूहिक व वैयक्तिक वसुलीची जबाबदारी सहकार आयुक्तांनी निश्चित केली आहे. निश्चित मुदतीत ही वसुली न झाल्यास संबंधित संचालक व जबाबदार व्यक्तींवर व्याजासकट रक्कम वसूल करण्यात येईल, असे आदेश देण्यात आले आहेत. या घोटाळ्याची एकूण रक्कम ५९८.७२ कोटी रुपये असून, ती माजी संचालक व कर्मचार्यांसह २५ जणांवर विभागण्यात आली आहे. तर अर्बन बँकेने ७५० कोटींचा घोटाळा, तर मेटल स्क्रॅप ट्रेडिंग कॉर्पोरेशनचे आणखी ४८० कोटी रुपये, अशी एकूण १२३८ कोटी रुपयांची रक्कम बुडवल्याची नोंद समोर आली आहे. एक लाख रुपयांपर्यंत ठेवीदारांना तातडीचा दिलासा देण्याची राज्य सरकारची हमी मात्र गेली चार वर्षे हवेतच विरली असल्याचे नरेन जाधव यांनी पत्रकार सांगितले.
बँक बुडवणाऱ्या प्रमुख संचालकांना वाचवण्यासाठी अप्रत्यक्षरीत्या प्रशासकीय यंत्रणा मदत करीत असल्याचा संशय नरेन जाधव यांनी व्यक्त केला. पेण शहरात मोकाट फिरणाऱ्या आरोपीला सहकार मंत्र्यांनी आणि सहकार आयुक्तानी कायदेशीर तरतुदी पूर्ण करुन तात्काळ अटक करावी अशी मागणी नरेन जाधव यांनी केली.
पेण बँकेचा घोटाळा होऊन आज १५ वर्षे झाली या १५ वर्षांच्या काळात ठेवीदार आणि खातेदारां पैकी सुमारे ६०० जण मृत्यूमुखी पडले असून. आज कित्येक जणांनावर उपासमारीची वेळ आली आहे. हजारो संसार उध्वस्त होऊन रस्त्यावर आले असून ही बँक बुडव्या शिशिर धारकर मत कशी मागतो असा सवाल नरेन जाधव यांनी केला. ठेवीदार आणि खातेदारांना खोटी आश्वासने आणि माहिती देऊन मतदारांचीही दिशाभूल करण्याचे काम शिशिर धारकर करत असल्याचा आरोप नरेन जाधव यांनी केला. शिशिर धारकर जेव्हा मत मागण्यासाठी येईल तेव्हा मतदारांनी बँकेच्या ठेवी केव्हा परत मिळणार असा सवाल धारकर याला मतदारांनी विचारावा असे आवाहन नरेन जाधव यांनी केले.



