मुख्यमंत्र्यांनी येताना नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरे घेऊनच पेणला या – नंदा म्हात्रे
पेण शहरातील विकासातील अनियमितता, भ्रष्टाचार आणि प्रलंबित प्रश्नांवर नागरिकांचा रोष.
पेण नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. आरोप-प्रत्यरोपाच्या फैरी उडायला सुरुवात झाली आहे. पेण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी ३ उमेदवार रिंगणात आहेत. आज काँग्रेसपक्षाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नंदा म्हात्रे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये येत्या २६ नोव्हेंबर रोजी पेण येथे येत असलेल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येताना पेणकरांच्या प्रश्नांची उत्तरे घेऊन येण्याचे आवाहन केले आहे.
आगामी नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पेण शहरातील विकासकामांतील विसंगती, भ्रष्टाचाराचे आरोप, पीएमएवाय घरे, पाणीपुरवठा योजना, अर्बन बँक ठेवीदारांचा प्रश्न आणि दैनंदिन नागरी समस्यांबाबत नागरिकांनी आणि उमेदवारांनी एकमुखाने आक्रोश व्यक्त केला आहे. जुना विकास आराखडा बदलून व्यावसायिक प्रकल्प उभे राहणे, रस्ता कामांतील कोट्यवधींची हेराफेरी, पाण्याच्या योजनांचे सतत बदलणारे आकडे आणि सहा वर्षांपासून पीएमएवाय घरांना न मिळालेला लाभ यामुळे पेणकरांमध्ये संताप उसळला आहे. “गार्डन जागी कॉम्प्लेक्स कसं ? ५ कोटींच्या रस्त्याचा खर्च २.५ कोटींवर आला, उरलेले पैसे कुठे गेले?” असे थेट प्रश्न नंदा म्हात्रे यांनी घेतलेल्या पत्रकार उपस्थित केले.
पेण अर्बन बँक को-ऑपरेटिव्ह बँकेच्या ठेवीदारांना अजूनही त्यांचे पैसे न मिळाल्याने रोष वाढला असून, “पैसे कधी मिळणार?” हा सरळ प्रश्न नागरिकांकडून समोर आला आहे. शहरातील पाणीपुरवठा योजना १६५–१७० कोटी रुपयांच्या दाव्यांमध्ये अडकून पडली असून, फिल्टरेशन प्लांट कधी उभा राहणार, याविषयी आजतागायत स्पष्ट उत्तर नाही. यात भर म्हणून धोकादायक ब्रिज, उड्डाणपूलाचा न सुटलेला प्रश्न, बस वळण्यास जागा नसणे, तसेच जूनमध्ये विक्रम–मिनिडोर–रिक्षा चालकांचे स्थलांतर या सर्वांवर कोणताही ठोस आराखडा नसल्याने पेणकरांत नाराजी वाढली आहे. भाजी मंडईतील अस्वच्छता आणि व्यवस्थापनातील गोंधळामुळे महाराष्ट्र भूषण नानासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाचा अपमान होत असल्याची भावना देखील तीव्र झाली आहे. या सर्व प्रलंबित प्रश्नांबाबत नागरिकांनी कठोर भूमिका घेतली असून येणाऱ्या निवडणुकांत लोकप्रिय नेते देवा भाऊ यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून सर्व मुद्द्यांवर लिखित आणि ठोस उत्तर द्यावे, अशी थेट मागणी करण्यात आली आहे. विकासातील अनियमितता, कोट्यवधींची टक्केवारी, अपूर्ण पाणी योजना, पीएमएवाय मधील विलंब, अर्बन बँक ठेवीदारांची फसवणूक, भाजी मंडईची अव्यवस्था, धोकादायक ब्रिज आणि रिक्षाचालकांच्या स्थलांतराचा प्रश्न या सर्वांवर स्पष्ट भूमिका जाहीर केल्याशिवाय जनतेला समाधान नाही. “पेणकरांच्या प्रश्नांना उत्तरे घेऊनच २६ नोव्हेंबरला या उत्तर द्या, मगच मत मागा” असे आवाहन नंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांना केले आहे.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष तथा रायगडच्या प्रभारी श्रीमती राणी अगरवाल, पेण विधानसभा निरीक्षक मनोज कांबळे, महाराष्ट्र प्रदेश चिटणीस श्रुती म्हात्रे, ओबीसी विभाग काँग्रेस कोकण विभाग शंभू म्हात्रे, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार नंदा म्हात्रे, तालुका अध्यक्ष अशोक मोकल, राष्ट्रवादी शरद पवार गट तालुका अध्यक्ष प्रकाश मोकल, माजी सरपंच बळीराम भोईर आदी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.



