भाजप – राष्ट्रवादीच्या कारस्थानामुळेच रायगडात महायुतीत बिघाडी – आमदार महेंद्र दळवी
पेण नगरपालिकेत परिवर्तन होणे गरजेचे – आमदार महेंद्र दळवी
प्रतिनिधी, पेण
भाजपचे व राष्ट्रवादीची मंडळी राजकीय कारस्थान करून शिवसेनेला सावत्र वागणूक देत असल्यानेच रायगडात महायुतीत बिघाडी झाली आहे. युतीचा धर्म आम्ही पाळणारे आहोत मात्र पेण नगरपालिकेच्या निवडणुकीत आमच्यावर अन्याय करीत असल्यानेच शिवसेना आपल्या ताकदीवर उमेदवार उभे करीत आहे. आता पेण नगरपालिकेमध्ये परिवर्तन होणे गरजेची आहे असे प्रतिपादन आमदार महेंद्र दळवी यांनी पेण येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.

माझ्या माध्यमातून मी साडेअकरा कोटींचा निधी पेण नगर परिषदेला राज्य शासनामार्फत देऊन युतीधर्म पाळला आहे. सुनील तटकरे यांची खासदारकी तसेच रवीशेठ पाटील यांच्या आमदारकीच्या निवडणुकीत देखील आम्ही युती धर्म पाळला असे असताना देखील राष्ट्रवादीचे अनिकेत तटकरे यांनी महाड येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत रायगडात भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाल्याचे जाहीर केले यावेळी शिवसेनेला त्यांनी जाणीवपूर्वक बाजूला ठेवल्याचे दिसून येत आहे ही घोषणा जरी अनिकेत तटकरे यांनी केली असली तरी त्यामागे संपूर्ण तटकरे कुटुंब असल्याची खात्री आम्हाला आहेे. भाजपाचे सतीश धारप व राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांनी कुटनीती करीत शिवसेनेला बाजूला ठेवण्याचे कारस्थान केल्याने शिवसेना स्वबळावर निवडणुकीसाठी सज्ज झाली असल्याचे आमदार दळवी यांनी यावेळी सांगितले.

पेण येथील युवा कार्यकर्ते भूषण कडू, माजी नगरसेविका ज्योती म्हात्रे, माजी नगरसेवक प्रकाश रामाणे, विश्वास पाटील, जयवंत म्हात्रे यांच्यासह अनेकांनी शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. या प्रसंगी रायगड जिल्हाप्रमुख राजा केणी, पेण तालुकाप्रमुख तुषार मानकवले, शहर प्रमुख दिनेश पाटील, लहूशेठ पाटील, राहुल पाटील, सपना पाटील, भारती सिंगासने आदी उपस्थित होते.




