ताज्या बातम्या

सर्वसामान्यांना दिलासा : अर्थमंत्र्यांनी दिली खुशखबर

टार्गेट २०४७ साठी एकूण ९ प्राधान्यक्रम निश्चित

राजमुद्रा न्यूज़ नेटवर्कदिल्ली

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज अर्थसंकल्प अर्थसंकल्प मांडले. यात सुरुवातीलाच युवा वर्ग आणि विद्यार्थ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या. पंतप्रधान पॅकेज अंतर्गत दोन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली.

अर्थसंकल्पात येणारं संपूर्ण वर्ष आणि त्यापुढील काळ लक्षात घेऊन आम्ही रोजगार, कौशल्य, एमएसएमई आणि मध्यमवर्गावर लक्ष केंद्रित करत आहोत. पाच वर्षांच्या कालावधीसाठी दोन लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या काळात ४.१ कोटी तरुणांना रोजगार, कौशल्य आणि इतर संधी उपलब्ध करून देण्यासाठी पंतप्रधान पॅकेज अंतर्गत पाच योजना आणि उपक्रम जाहीर करताना आनंद होत असल्याचे सीतारमण म्हणाल्या.

२० लाख तरुणांना रोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण देण्यात येणार आहे. एक हजार कौशल्य प्रशिक्षण संस्थांचे अपग्रेडेशन करण्यात येणार आहे. नवे कौशल्य विकास कोर्सेस सुरू करणार असल्याचंही सीतारमण यांनी सांगितलं. कोणत्याही योजनेसाठी पात्र नसलेल्या विद्यार्थ्यांना देशांतर्गत उच्च शिक्षणासाठी १० लाख रुपयांचे कर्ज देण्यात येईल, असेही सीतारमण यांनी जाहीर केले. ही योजना ईपीएफओमध्ये नोंदणीवर आधारित असेल. यामध्ये प्रथमच काम करणाऱ्या कामगारांना सर्व औपचारिक क्षेत्रात काम सुरू केल्यावर एक महिन्याचा पगार मिळेल. एका महिन्याचे १५ हजार रुपयांपर्यंतचे वेतन डीबीटीद्वारे तीन हप्त्यांमध्ये दिले जाईल. याचा लाभ घेण्यासाठी पात्रता मर्यादा एक लाख रुपये प्रति महिना पगार असेल. लाखो तरुणांना या योजनेचा लाभ अपेक्षित आहे

लक्ष २०४७

दरम्यान, २०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अर्थमंत्र्यांनी एकूण ९ प्राधान्यक्रम निश्चित केले आहेत. यात १. कृषी उत्पादकता आणि कृषी सामर्थ्य २. रोजगार आणि कौशल्ये ३. सामाजिक न्याय ४. उत्पादन आणि सेवा ५. शहर विकास, नागरी विकास ६. ऊर्जा सुरक्षा ७. पायाभूत सुविधा ८. इनोव्हेशन, संशोधन आणि विकास ९. नेक्स्ट जनरेशन सुधारणा यांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!