सामाजिक

समाजात चुकीचे वागणाऱ्यांची कधीच गय केली जाणार नाही – रायगड पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे

सुहित जीवन ट्रस्ट पेण येथे बालसंरक्षण, सतर्कता व सुरक्षितता जनजागृतीपर अभियान संपन्न !

अरविंद गुरव, पेण

गतिमंद मुलांची नामांकित शाळा म्हणून ओळख असलेल्या सुहीत जीवन ट्रस्ट पेण येथे बालसंरक्षण, सतर्कता व सुरक्षितता अभियान २०२४ हा जनजागृतीपर कार्यक्रम संपन्न झाला. सध्याची परिस्थिती, सामाजिक मानसिकता याचा विचार करून संस्थेने हा अत्यंत उपयुक्त व अनोखा जनजागृतीपर उपक्रम आयोजित केला होता.

यावेळी व्यासपीठावर रायगडचे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे, बाल न्यायमंडळ रायगड सदस्या डॉ.नीता कदम, पेण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मंगेश नेने, पेण पोलीस निरीक्षक संदीप बागुल, सिद्धि प्रिंटर्सचे मालक भूषण पाठक, कार्यक्रमाच्या आयोजक सुहित जीवन ट्रस्टच्या अध्यक्षा डॉ.सुरेखा पाटील, सचिव वरूण पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी उपस्थित मुलांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, खाकी वर्दीतला पालक या नात्याने सुहित जीवन ट्रस्टच्या गतिमंद मुलांशी अत्यंत जिव्हाळ्याचा सुसंवाद साधला. तसेच सर्व पोलिस आपले पाठीराखे आहेत याची या कार्यक्रमातून जाणीव करून दिली. एवढेच नव्हे तर समाजातील सर्वच स्तरात सावधानता, संवेदनशीलता व सतर्कता असणे गरजेचे आहे हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. तसेच समाजात चुकीचे वागणाऱ्यांची कधीच गय केली जाणार नाही असाही सज्जड दम देण्यात आला. बालसंरक्षण, सतर्कता, सुरक्षितता व निर्भयता याबद्दल घार्गे यांनी उपस्थित महिला, विद्यार्थीनी, पालक व शिक्षक यांना सविस्तर मार्गदर्शन केले. संस्था समर्थपणे व सक्षमतेने गेली २० वर्षे या विशेष मुलांसाठी करीत असलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांनी संस्थेचे कौतुक केले, तसेच संस्थेचे कार्य पाहून मी अतिशय भारावून गेलो असेही गौरवोद्गार घार्गे यांनी व्यक्त केले. सुहित जीवन ट्रस्ट या संस्थेने पुढाकार घेऊन असा संवेदनशील उपक्रम हाती घेतल्याबद्दल सर्वच स्तरावरुन त्यांच्या समायोचीत कामगिरी बद्दल कौतुक कऱण्यात येतं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error:Content is protected !!